Saturday 24 October 2015

3 उपकमांडरसह 7 नक्षल वाद्यांचे आत्मसमर्पण



गडचिरोली दि.24- गडचिरोली पोलिस दलाच्या कार्यक्षमतेमुळे व शासनाच्या नक्षवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेमुळे जिल्हयाचे चित्र बदलत आहे. या अंतर्गत 3 कमांडरसह 30 लाखांचे बक्षीस असणारे 7 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील.

या सात जणांच्या आत्मसर्पणामुळे यावर्षी शरण आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 35 झाली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ 8 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पोटके पोलिस ठाणे क्षेत्रातील 15 जहाल नक्षवाद्यांचा समावेश आहे.

पोलिस विभागातर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रम आणि पुनर्वसन योजना यामुळे प्रेरित होवून हे नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी समोर आले आहेत. असे पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले.

दलम मधील उपकमांडर जानू उर्फ सोमा गोंगलू गोटा याच्यासह राजेश उर्फ कोटेश्वरराव बोरीया कनिती (तेलंगणा) , दलम उपकमांडर निर्मला उर्फ सरिता नरोटे, छत्तीसगडच्या कुत्तुल दलाचा सदस्य श्यामराव उर्फ टांगरु मिसा उसेंडी, रतन मुन्शी कोवासे , सुशीला उर्फ सुखमनी राजू मडावी तसेच रम्मी उर्फ महानंदा मानू पोटावी अशी या आत्मसमर्पित नक्षल वाद्यांची नावे आहेत.

गडचिरेाली जिल्हयात पोलिस दलाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली याचा जबर धक्का या नक्षलवादी चळवळीला बसला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास संपादन करणे त्यांना शक्य झाले त्याचा परिणाम या प्रकारच्या आत्मसमर्पणातून सकारात्मक पध्दतीने दिसत आहे.

नक्षलवाद विरोधी उपक्रमासोबतच समाज उपयोगी कार्यक्रम पोलिसदल सातत्याने घेत आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे आलेल्या या नक्षलवाद्यांचे समाजाच्या मुख्यप्रवाहात सामिल होण्याच्या दृष्टीकोणातून पुनर्वसन करण्याकडेही विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला उतरती कळा लागल्याचे चित्र आता दिसत आहे.

या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment