Saturday 21 November 2015

गडचिरोलीत उद्योग यावेत याबाबत शासन आग्रही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोहोर्ली ताडोबा चंद्रपूर : गडचिरोलीत उद्योगांनी यावे असे प्रयत्न आपण करीत आहोत. मात्र केवळ कच्चा माल घेण्यापुरते न येता या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार संधी प्राप्त व्हावी यासाठी याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील उभारण्याची अट त्यांना असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

वन विभाग अधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपले शासन कायमच आग्रही राहिलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या लंडन दौऱ्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची त्यांनी भेट घेतली. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

गडचिरोलीत मुबलक असे आयर्न ओर आहे. ज्याच्या प्रक्रियेतून कार उद्योगाला लागणाऱ्या स्टीलची निर्मिती होऊ शकते. महाराष्ट्र सध्या ऑटोमोबाईल हब बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर येथे या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने असे उद्योग सुरु होऊ शकतात. यात ते उद्योग याच भागात सुरु करण्याची अट राहील, असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्हा घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

चंद्रपूर : राज्याच्या वर्षपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या 8 पानी विशेष घडीपत्रिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले.

ताडोबा येथील मोहर्ली या गावात मुख्यमंत्री वनविभागाच्या एका कार्यशाळेच्या समारोपास आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत हे विमोचन झाले. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घडीपत्रिकेबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, संजय धोटे, किर्तीकुमार भांगडिया, महापौर राखी कंचर्लावार तसेच प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.निगम व श्री.भगवान आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यात नव्या शासनाच्या वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा या घडीपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आठ पृष्ठांची सचित्र घडीपत्रिका जिल्ह्यात विविध क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा परिचय देते.

अतिदुर्गम आणि राज्याच्या सिमावर्ती भागाच्या या जिल्ह्यात नक्षल चळवळीचा उपद्रव आहे. याचा मुकाबला शासनाने उत्तमरित्या केला आहे. या ठिकाणी पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या नक्षलवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेत या वर्षभराच्या कालावधीत 35 जणांनी प्रतिसाद देऊन नक्षलवादाचा मार्ग सोडला.

आत्मसमर्पण करणाऱ्‍या नक्षलवाद्यांचे पुनवर्सन आणि नक्षलवादी व त्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्य प्रशिक्षण याबाबतची माहिती यात आहे.

या जिल्ह्यात असणाऱ्‍या आदिवासी कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्‍या मुला-मुलींना जगाचा परिचय व्हावा या उद्देशाने पोलीस दल महाराष्ट्र दर्शन सहल आयोजित करते. या विद्यार्थी सहलीतील मुलांशी मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याबाबतची इतर माहिती या घडीपत्रिकेत आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सिंचन संदर्भातील कामे झाली. या माध्यमातून संरक्षित जलसिंचन क्षमता या जिल्ह्यात निर्माण झाली आणि त्यामुळेच एका पिकावर समाधान मानणाऱ्‍या या जिल्ह्यात आता दुसऱ्‍या हंगामात पिके घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामांचा सचित्र आढावा यामध्ये घेण्यात आला आहे.

अतिदुर्गम अशा या जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची आहे. या वनांचे सरंक्षण करताना याच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी वनविभाग कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बांबूवर आधारित उद्योग, अगरबत्ती प्रकल्प आदी जिल्ह्यात आहेत. ही या जिल्ह्याच्या दृष्टीने एक यशकथाच म्हणावी लागेल. याचीही सचित्र माहिती यात सामील आहे.

Tuesday 17 November 2015

गडचिरोलीच्या विकासाची बांधिलकी !

राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि श्रीलक्ष्मी मीत्तल यांच्या भेटीच्या प्रसंगीचे छायाचित्र
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागाचा विकास हे खूप मोठं आवाहनात्मक काम आहे. यात उद्योग व्यवसाय आणि दळण-वळणाची साधने वाढवून जलदगतीने विकास साधणं शक्य आहे. याचा पूर्ण अभ्यास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून या भागाच्या विकासाप्रती असणारी आपली बांधिलकी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात याचीच प्रचिती आलेली आहे.
विस्ताराने राज्यात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हा जिल्हा वनसंपत्ती आणि खनिजांनी समृध्द असा जिल्हा आहे. वर्षभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी प्राधान्यक्रमाने जिल्हयाचा दौरा करुन या जिल्ह्याच्या विकासाची निकड असल्याची जाणीव सर्वांनाच करुन दिली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या आदिवासी विकासाचे राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याही कडून या जिल्हयाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र गेल्या वर्षभराच्या कालावधीत दिसत आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयात रस्त्यांचे जाळे कसे विस्तारीत करता येईल याबाबत बैठका घेऊन या संदर्भातील आराखडा त्यांनी अंतिम करवून घेतला. या माध्यमातून हा जिल्हा देशाच्या इतर भागांशी चारपदरी राष्ट्रीय महामार्गांनी बनण्याचा मार्ग आता खूला झाला. यामध्ये साकोली-वडसा-गडचिरोली-आलापल्ली ते सिरोंचा हा मार्ग महत्वाचा आहे. साधारण 250 किमी लांबीचा हा महामार्ग जिल्हयाला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल हे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने याठिकाणी येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर बदल दिसतील व जिल्हा झपाटयाने विकसित होईल यात शंकाच नाही.

याच पध्दतीचा पाठपुरावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाईगंज (वडसा) - गडचिरोली रेल्वे मार्गाबाबत केल्याने या रेल्वे मार्गाच्या कामालाही गती मिळाली. केंद्र आणि राज्य यांच्या 50:50 टक्के भागीदारीतून निर्माण होणाऱ्या या मार्गासाठी राज्याचा वाटा केवळ मंजूर केला असं नाही तर त्याची तरतूदही या वर्षीच्या अर्थसंकल्पात झाली हे उल्लेखनीय.

दिवाळीच्या पूर्वसंध्येस या मार्गाबाबत निविदापूर्व चर्चा देखील झाली. या मार्गाचे काम येत्या 3 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास गडचिरोली देशातील सर्वच भागांना जोडले जाईल आणि या जिल्हयातील प्रत्येकाचे गडचिरोली-मुंबई थेट रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. याची मुहूर्तमेढ आता रोवली गेली आहे. राज्यात वर्षपूर्ती केलेल्या शासनाने गडचिरोली वासीयांना दिलेली ही सर्वात मोलाची भेट ठरली आहे.

विदेश दौऱ्यात उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांना महाराष्ट्रात उद्योग उभारणी करण्यासाठी प्रेरित करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास वैशिष्ट्य आहे. या कामातही त्यांची गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची बांधिलकी दिसली. जग ज्यांना स्टील उद्योगाचे "किंग" म्हणून ओळखते अशा लक्ष्मी मित्तल यांना गडचिरोलीत उद्योग सुरु करण्याबाबत आग्रहीपणाने सूचविले.

 गडचिरोली जिल्हयात वनसंपत्ती सोबत लोहखनिज मुबलक प्रमाणात आहे. जिल्हयातील सूरजागड भागात याची उपलब्धता अधिक आहे. त्यामूळे या भागात स्टील उद्योगाची उभारणी सहजशक्य आहे. त्याच्या जोडीला रस्ते आणि रेल्वेचे जाळेदेखील उभे राहत आहे. त्यामुळे उद्योग उभारणी अधिक सुकर होणार आहे.
 
दिनांक: 17 नोव्हेंबर 2015
प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
गडचिरोली
9823199466

Tuesday 3 November 2015

राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूरला 2 औरंगाबादला 1 विजेतेपद

मुंबई, दि.3- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनातून गडचिरेाली जिल्हयाने आपली क्षमता दाखवली आहे. येणा-या काळात जिल्हयात खेळाडूसाठी तालुकास्तरापर्यंत सुविधा व प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले.

गडचिरोलीतील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणात ते बोलत होते. स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात औरंगाबाद विभागाने तर उर्वरित 2 गटात कोल्हापूर विभागाने जेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामन्याची १९ वर्षाखालील गटातली लढत चांगलीच रंगली

स्पर्धेच्या 19 वर्षाखालील वयोगटात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, सासवड संघाला पराभूत केले.

या पुरस्कार वितण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी गडचिरेालीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार हे होते कार्यक्रमास आमदार डॉ. देवराव होळी , नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, गडचिरोली क्रीडा परिषद सदस्य व गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर , जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धाचा सविस्तर निकाल खालीप्रमाणे

वयोगट 14 वर्षे
विजेता संघ - कोल्हापूर विभाग, विश्वास विद्यानिकेतन , चिखली , ता. शिराळा, जि. सांगली

उपविजेता संघ- नाशिक विभाग, ब्राईट इंग्लीश मिडीयम स्कुल , शिंदखेडा जि. धुळे

तृतीय स्थान - मुंबई विभाग, जी.एस. पी.एम. ऋषीकूल विदयालय मुंबई

वयोगट 17 वर्षे

विजेता संघ- कोल्हापूर विभाग , विश्वास विद्यानिकेतन ,चिखली

उपविजेता संघ- पूणे विभाग , सिम्बॉयसीस स्कूल ,पूणे4

तृतीय स्थान - अमरावती विभाग, न्यू इंग्लीश हॉयस्कुल आणि ज्यूनिअर कॉलेज ,अकोला

वयोगट 19 वर्षे
विजेता संघ - औरंगाबाद विभाग , डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय ,औरंगाबाद

उपविजेता -पूणे विभाग, पुरंदर ज्यु. कॉलेज सासवड

तृतीय स्थान - कोल्हापूर विभाग , विदयामंदिर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ,इस्लामपूर , सांगली

Sunday 1 November 2015

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा गडचिरोलीत शानदार शुभारंभ


गडचिरोली, दि.1-राज्याच्या आठ विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे लयबध्द संचलन आणि विविध रंगानी सजलेली मैदाने अशा शानदार पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवडचाचणी स्पर्धेचे आज एका दिमाखदार सोहळयात गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. राज्याच्या आठ विभागातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील गट निहाय प्रत्येक आठ असे एकूण 24 संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. यासोबतच निवड चाचणी स्पर्धा येथे होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघाची निवड येथे होणार आहे. स्पर्धेत 288 खेळाडू खेरीज निवड चाचणीत 120 खेळाडू सहभागी होण्यासाठी राज्यभरातून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण आणि क्रिडा ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी संघानी संचलन केले. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा खासदार नेते यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सैनिक शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना मुंबई आणि नाशिक संघादरम्यान खेळवला गेला. स्पर्धेत राज्य संघाची निवड होईल यासाठी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे 15 सदस्य आणि निवड समितीचे 9 सदस्यही आले आहेत. स्थानिक स्तरावर गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सतिश पवार तसेच इतर सदस्य मदत करीत आहेत.

गडचिरोली सारख्या जिल्हयात किती चांगल्या प्रकारचे नियोजन करुन राज्यस्तर स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात हे या स्पर्धेच्या रुपाने सर्वांना बघायला मिळाले आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असून अगदी तालूक्यापर्यंत क्रिडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देणार आहेात असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयात राज्यासाठीचे आदिवासी खेळाडूंसाठीचे सर्वात मोठे क्रीडा सुविधा असणारे संकूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. गडचिरोली किंवा अहेरी यापैकी एका ठिकाणी ही सुविधा असेल. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा गडचिरोलीत शानदार शुभारंभ


गडचिरोली, दि.1-राज्याच्या आठ विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे लयबध्द संचलन आणि विविध रंगानी सजलेली मैदाने अशा शानदार पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवडचाचणी स्पर्धेचे आज एका दिमाखदार सोहळयात गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. राज्याच्या आठ विभागातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील गट निहाय प्रत्येक आठ असे एकूण 24 संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. यासोबतच निवड चाचणी स्पर्धा येथे होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघाची निवड येथे होणार आहे. स्पर्धेत 288 खेळाडू खेरीज निवड चाचणीत 120 खेळाडू सहभागी होण्यासाठी राज्यभरातून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण आणि क्रिडा ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी संघानी संचलन केले. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा खासदार नेते यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सैनिक शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना मुंबई आणि नाशिक संघादरम्यान खेळवला गेला. स्पर्धेत राज्य संघाची निवड होईल यासाठी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे 15 सदस्य आणि निवड समितीचे 9 सदस्यही आले आहेत. स्थानिक स्तरावर गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सतिश पवार तसेच इतर सदस्य मदत करीत आहेत.

गडचिरोली सारख्या जिल्हयात किती चांगल्या प्रकारचे नियोजन करुन राज्यस्तर स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात हे या स्पर्धेच्या रुपाने सर्वांना बघायला मिळाले आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असून अगदी तालूक्यापर्यंत क्रिडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देणार आहेात असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयात राज्यासाठीचे आदिवासी खेळाडूंसाठीचे सर्वात मोठे क्रीडा सुविधा असणारे संकूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. गडचिरोली किंवा अहेरी यापैकी एका ठिकाणी ही सुविधा असेल. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.